(Gujrat Rain Update) गुजरातच्या किनारपट्टीवर जोरदार पावसामुळे समुद्र खवळल्याची परिस्थिती निर्माण झाली असून अमरेली, जाफराबाद आणि सोमनाथ परिसरात समुद्रातील लाटांचा जोर वाढला आहे. या दरम्यान तीन बोटी बुडाल्याची माहिती समोर आली आहे.
सोमनाथजवळ सुमारे 15 नॉटिकल मैल अंतरावर असलेली एक बोट पाण्याने भरू लागली. इतर बोटींनी तिला किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रचंड लाटा आणि वादळी वाऱ्यांमुळे ती बोट अखेर बुडाली. सुदैवाने या बोटीत असणाऱ्या सर्व आठ मच्छीमारांना इतर बोट मालकांनी वेळेवर वाचवले. हे सर्व मच्छीमार उमरगाम तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारीही पावसाची तीव्रता न थांबता समुद्र अधिक खवळलेला दिसून आला. वाऱ्याचा वेग वाढल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
वादळी वाऱ्यांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा कडक इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरांत मुसळधार सरींचा जोर कायम असून किनारपट्टीवर पावसासह वाऱ्याचा तडाखा वाढला आहे.