महाराष्ट्रातील पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आल्याने यावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, आमची रायगडच्याबाबतीमध्ये मागणी होतीच की, आमचे तीन आमदार तिथेच आहेत. देवेंद्रजींकडे एकनाथ शिंदे साहेब यांनी मागणी केली होती की, आम्हाला त्याठिकाणी पालकमंत्रीपद मिळावं. गोगावलेजींना पालकमंत्री पद मिळायला पाहिजे होते. नाशिकमध्ये राष्ट्रवादीने ती मागणी केलेली आहे. त्यामुळे वरचा निर्णय घेण्याकरता देवेंद्रजी दावोसला असल्यामुळे निश्चितपणाने त्यांनी ही स्थगिती दिली असेल, आल्यावर तोडगा निघेल. असे गुलाबराव पाटील म्हणाले.