गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगतदार सामना झाला. शुबमन गिलच्या नेतृत्वात उतरलेल्या गुजरात टायटन्सने मुंबईचा ६ धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ६ विकेट्स गमावून १६८ धावा केल्या होत्या. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला १६२ धावाच करता आल्या. शेवटच्या षटकात मुंबईला विजयासाठी १९ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी मैदानात उतरलेल्या हार्दिक पंड्याने उमेश यादवच्या शेवटच्या षटकात षटकार आणि चौकार ठोकून मुंबईच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. परंतु, उमेशने हार्दिकला ११ धावांवर बाद केल्यावर गुजरातने सामना खिशात घातला आणि आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विजयाची मोहोर उमटवली.
या मैदानात पुनरागमन करुन चांगलं वाटत आहे. कारण हा एक असा मैदान आहे, जिथे तुम्ही आनंदाने खेळू शकता. येथील वातावरणाचा चांगल्या प्रकारे अनुभव घेऊ शकता. मैदान क्रिडाप्रेमींनी तुडुंब भरलं होतं. त्यांना एक रोमांचक सामनाही पाहायला मिळाला. तिलक वर्माकडून राशिदच्या गोलंदाजीवर धाव घेतली नाही. कारण त्यावेळी तिलकला वाटलं, हाच एक उत्तम निर्णय आहे. मी पूर्णपणे त्याचं समर्थन करतो. कोणताच प्रश्न नाहीय, अजून आम्हाला १३ सामने खेळायचे आहेत.
मुंबईला शेवटच्या सहा षटकांत जिंकण्यासाठी ४८ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी मुंबईच्या हातात ७ विकेट्स बाकी होत्या. परंतु, त्यानंतर गुजरात टायटन्सने धमाकेदार वापसी केली आणि सामना त्यांच्या बाजूने फिरवला. मुंबईसाठी डेवाल्ड ब्रेविसने ४६, तर रोहित शर्माने ४३ धावा केल्या. याशिवाय गुजरातसाठी उमरजई, स्पेंसन जॉनसन, मोहित शर्मा आणि उमेश यादवला प्रत्येकी दोन विकेट्स मिळाल्या.