Raghuji Bhosale Sword Return : नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील पराक्रमी सरदार रघुजी भोसले प्रथम यांची ऐतिहासिक तलवार अखेर महाराष्ट्राच्या ताब्यात आली आहे. लंडनमधील लिलावातून राज्य सरकारने ही अमूल्य ऐतिहासिक वस्तू विकत घेतली असून, सोमवारी 18 ऑगस्ट रोजी ती मुंबईत दाखल होणार आहे.
लिलावापासून ताब्यापर्यंतचा प्रवास
28 एप्रिल 2025 रोजी तलवार लिलावासाठी निघाल्याची माहिती महाराष्ट्रात पोहोचताच राज्य सरकारने हालचालींना गती दिली.सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलारांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.त्याच रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री आणि मंत्री शेलार यांच्यात सतत संवाद सुरू राहिला. भारतीय दूतावासाच्या माध्यमातून संबंधित देशाशी संपर्क साधण्यात आला.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, मध्यस्थाची नेमणूक करून महाराष्ट्र सरकारचा लिलावात सहभाग निश्चित करण्यात आला.कठोर पाठपुराव्यानंतर आणि स्पर्धात्मक बोली लावून अखेर महाराष्ट्राने हा लिलाव जिंकला व तलवार परत आणण्याचा मार्ग मोकळा झाला.
लंडनमध्ये औपचारिक ताबा
लिलाव जिंकल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ॲड. आशिष शेलार यांनी लंडनमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून तलवार स्वीकारली. या वेळी लंडनमधील मराठी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. “अनेक पराक्रमांची साक्ष देणारी ही तलवार आपल्या ताब्यात घेण्याचे भाग्य लाभले. हा केवळ माझा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा ऐतिहासिक विजय आहे,” असे शेलार यांनी भावना व्यक्त केल्या. उपस्थित मराठी समाजाने घोषणाबाजी करत आणि जल्लोष साजरा करून या क्षणाचे स्वागत केले.
18 ऑगस्टला महाराष्ट्रात भव्य स्वागत
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तलवार सोमवारी, 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार आहे. विमानतळावरून भव्य बाइक रॅलीच्या माध्यमातून तलवार दादर येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीपर्यंत नेली जाणार आहे.
याच दिवशी संध्याकाळी ‘गड गर्जना’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यात या ऐतिहासिक विजयाचा उत्सव साजरा केला जाईल.
सरकारचे आभार प्रदर्शन
या मोहिमेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वामुळे हा क्षण शक्य झाल्याचे शेलार यांनी नमूद केले. “सरकारच्या नावाने नोंद होईल असा हा ऐतिहासिक आणि आनंदाचा क्षण आहे,” असे ते म्हणाले.
या ऐतिहासिक विजयामुळे मराठा इतिहासातील एक अनमोल ठेवा पुन्हा मायभूमीत परतला असून, संपूर्ण महाराष्ट्रात अभिमानाची लाट उसळली आहे.