मारकडवाडी प्रती मतदानाच्या निर्णयामुळे देशामध्ये चर्चेत आलेलं गाव. या निर्णयामुळेच मारकडवाडीची चर्चा दिल्लीतच काय तर संसदेतही झाली. मार्कडवाडीमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आणि गावकऱ्यांवर खटले भरण्यात आले. ईव्हीएमच्या विरोधात विरोधक राज्यासह देशभरात रान पेटवत आहेत. आज शरद पवारांनी मारकडवाडीला भेट दिली. राहुल गांधीही भेट देणार आहेत.
मारकडवाडीतील महिलांची ही प्रतिक्रिया विरोधकांनी उचलून धरल्याचं चित्र पहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकांनंतर ईव्हीएम विरोधात विरोधकांनी रान पेटवायला सुरूवात केली आहे. त्यातच महायुतीच्या महाशपथविधीच्या दोन दिवस आधी मारकडवाडीतील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर वोटींगचा निर्णय घेतला आहे. शासनाने मारकडवाडीत जमावबंदीचे आदेश लागू केले आणि गावाला छावणीचं स्वरूप आलं. तर गावकऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी रविवारी मारकडवाडीला भेट देत येथील नागरिकांशी संवाद साधला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनीही ईव्हीएमवरून सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे. तर त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. राम सातपुतेंसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीही शरद पवारांना सल्ला दिला आहे. सदाभाऊ खोतांनी तर ईव्हीएम काँग्रेसच्याच काळात आल्याचं म्हणत शरद पवारांवर टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सुरू झालेली ईव्हीएम विरोधातील धग संपूर्ण देशात वणव्यासारखी पसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुका पाहता विरोधक ही धग काही केल्या शांत होऊ देणार नाही अशीच शक्यता आहे. सध्यातरी राज्यासह देशातलं राजकारण मारकडवाडीकडे केंद्रीत झाल्याचं पहायला मिळत आहे. राहुल गांधीही मारकडवाडीला भेट देणार आहेत. तर ईव्हीएम विरोधात मोठा लढा उभारणार असल्याचं विरोधकांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-