आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाणे जिल्ह्यात राजकीय समीकरणांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून, यामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गडाला मोठा धक्का बसला आहे.
रविवारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे झालेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याला स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. ठाण्यातील राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विलास पाटील, ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष अभिषेक पुसाळकर, ओवळा-माजिवडा विधानसभा महिला अध्यक्ष राणी देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
शिंदे यांचे स्वागतपर भाषण
पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांचे स्वागत करताना एकनाथ शिंदे म्हणाले,
“छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, भारत माता की... भारत आंबे माता की... आज ठाण्यात आपल्यासोबत राष्ट्रवादीचे विक्रम खामकर, प्रफुल कांबळे, विलास पाटील, अभिषेक पुसाळकर, राणी देसाई, विशाल भालेराव, सुनील कुन्हाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मी सर्व लाडक्या भगिनी आणि भावांचे मनापासून स्वागत करतो.”
ते पुढे म्हणाले,
“मी मुख्यमंत्री होतो, आज उपमुख्यमंत्री आहे. पण या सगळ्या पदांपेक्षा मी नेहमी कार्यकर्ता म्हणूनच काम केलं आहे आणि करतोय. ठाणे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. आज इथं झालेल्या या प्रवेशामुळे हा बालेकिल्ला अधिक मजबूत होणार आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागे हा एकनाथ शिंदे उभा असतो. त्यामुळे काळजी करू नका. हा पक्ष मालक-नोकर असा नाही, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.”
राष्ट्रवादीतील नाराजीचा परिणाम
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली नाराजी आणि गटबाजी ठाण्यात उघड झाली आहे. कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने झालेल्या या प्रवेशामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या संघटनात्मक ताकदीला फटका बसल्याचे मानले जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेग
ठाणे महापालिका ही शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. त्यामुळे शिंदे गटाने बैठका, मोर्चेबांधणी आणि पक्षप्रवेश अशा विविध माध्यमांतून संघटन वाढवण्याचे धोरण राबवले आहे. या ताज्या घडामोडींमुळे आगामी महापालिका निवडणुकीत ठाण्यातील लढत आणखी रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.