गाव तिथं एसटी हे वाक्य आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलो आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येकजणाने एसटीने कधी ना कधी प्रवास केलेला असतो. किंवा एसटी पाहिलेली तर असतेच असते. पण गडचिरोली जिल्ह्यातील दहा ते बारा गावांनी एसटी आयुष्यात कधी पाहिलीच नव्हती. याच गावांमध्ये आता एसटी अवतरलीय. एखादी सासुरवाशीन माहेरी आल्यावर तिला ओवाळावं, तसं गावकऱ्यांनी एसटीला ओवाळलंय. वाचूयात, याबाबातचा एक स्पेशल रिपोर्ट...
एखादी महाराणी यावी तशी ही एसटी येतेय... नीट पाहा या एसटीला. तुम्ही म्हणाल त्यात काय नवल एसटी तर आम्ही नेहमीच पाहतो. पण मंडळी हे झालं तिमचं आमचं पण गडचिरोलीतल्या या दहा ते बारा गावातल्या लोकांसाठी ही फार अप्रुपाची गोष्ट आहे. कारण या मंडळींनी आयुष्यात कधी एसटी पाहिलीच नव्हती. गेल्या चार दशकांपासून गडचिरोली म्हणजे नक्षलवाद हे जणू समीकरणच झालं होतं. जंगलाने वेढलेल्या शेकडो गावांमध्ये नक्षलवादी म्हणतील तीच पूर्व दिशा अशी स्थिती होती.
आपलं वर्चस्व कायम राहावं आणि शासनाच्या कल्याणकारी योजना आदिवासींपर्यंत पोहोचूच नयेत असा नक्षलवाद्यांचा प्रयत्न असायचा. त्यातूनच दुर्गम गावांना शहराला जोडण्यासाठी तयार केले जाणारे रस्ते, नद्यांवरील पूल अशा सुविधाही नक्षलवादी होऊ देत नव्हते. पण अलीकडच्या काही वर्षात पोलिसांनी आदिवासींचे मित्र बनत त्यांना प्रगतीचा मार्ग दाखवला. भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना नक्षल्यांच्या दहशतीतून मुक्त केलं. त्यामुळं नक्षलवाद्याचं अस्तित्व पणाला लागून रखडलेली विकासाची कामंही पूर्ण होऊ लागली. दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे वेगाने वाढू लागले. त्यातूनच ज्या गावांनी कधीही एसटी बस पहिली नाही अशाही गावांमध्ये बस पोहोचू लागली. आता ही एसटी गावात आल्यामुळे एखादी माहेरवाशीनीला ओवाळवं तसं या ग्रामस्थांनी एसटीची पूजा केली.
नागरिकाने लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस म्हणाले की, "माजी मंत्री आणि अहेरीचे आमदार असलेले धर्मरावबाबा आत्राम यांनी रस्ता तयार होताच अहेरी ते कासमपल्ली, गुर्जा, वेडमपल्ली, कोंदावाही, बिड्री,येमली या मार्गावर बस सुरू केली. ज्या-ज्या गावांमध्ये बस जाऊ शकते त्या बहुतांश गावांमध्ये बस फेरी सुरू करण्यासाठी ते आग्रही आहेत."
येरमनार गावाचे माजी सरपंच बालाजी गावडे यांनी लोकशाही मराठीसोबत संवाद साधला आहे. त्यावेळेस ते म्हणाले की, "एकीकडे उच्च दर्जाच्या लोहखनिजामुळे स्टील हब होऊ पाहणारा गडचिरोली जिल्हा आता खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होत आहे, हे चित्र नक्कीच आशादायी आहे. त्यातच आता प्रगतीच्या वाटेवर धावणाऱ्या गडचिरोलीतल्या दुर्गम गावांमध्ये एसची अवतरलीय".