मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी (VBA) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात मुंबईतील जागा वाटपाबाबत चर्चा सुरु होत्या. अखेर आज वंचित आणि काँग्रेसने एकत्रित पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर मैदानात उतरणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारिप सोबत आमची आघाडी होती.
1999 नंतर राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र नव्हतो. 25 वर्षानंतर आघाडीच्या घोषणेचा मला आनंद आहे. काँग्रेस आणि वंचित हे नैसर्गिक मित्र आहेत. काँग्रेस आणि वंचितमध्ये चांगलं नातं आहे, असे म्हणत त्यांनी मुंबईत वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा केली. आमची आघाडी विचाराची आहे. सत्तेसाठी आमची आघाडी नाही. जागांपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. हा संख्येचा खेळ आणि तर हा विचारांचा मेळ आहे. आमची आघाडी विचारांची आहे, सत्तेसाठी नाही. आजपासून आम्ही दोन मित्रपक्ष आहोत. मुंबई महापालिकेत वंचित आणि काँग्रेस एकत्र लढणार, असे देखील ते म्हणाले.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने 227 पैकी 62 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष, धैर्यवर्धन पुंडकर यांनी या निर्णयाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आणि प्रकाश आंबेडकर यांनी ऑनलाइन बैठकीत युतीला मान्यता दिली आहे. यामुळे, आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन मुंबईतील बहुमत मिळवण्यासाठी तयारी करत आहेत.
काँग्रेस मुंबईत किती जागा लढणार, याबाबत काँग्रेसने अद्याप स्पष्टता दिलेली नाही. काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात जागा वाटपावर चर्चा सुरू असून, काँग्रेसने शरद पवार पक्षाला केवळ 9 जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. काँग्रेसने जागा वाटपावर निर्णय घेतला नसल्यामुळे, मुंबईत काँग्रेस किती जागा लढणार हे स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांच्या लुकचीही जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गांधी टोपी, नेहरू जॅकेट आणि धोतर या पारंपरिक पोशाखात युतीची घोषणा केली. त्यांच्या या लुकवर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी युतीला सर्वधिकाराने मैदानात उतरायचं आहे. आता पुढील काळात ही युती काँग्रेसला किती प्राबल्य मिळवून देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.