भारतीय संघाने आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात केली आणि स्पर्धेचा किताब नऊव्यांदा आपल्या नावावर केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत केवळ 146 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 5 गडी गमावत हे लक्ष्य सहज गाठले. शेवटच्या षटकात आवश्यक असलेल्या 10 धावा तिलक वर्माने हरिस रौफला मिडविकेटवर मारलेल्या षटकाराने आणि त्यानंतर रिंकू सिंगच्या चौकाराने भारताच्या विजयाला शिक्कामोर्तब केले.
गौतम गंभीरचं सहा शब्दांचं ट्विट
या ऐतिहासिक विजयावर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी नेहमीप्रमाणे थेट आणि अचूक प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर गंभीर यांनी फक्त सहा शब्दांत ट्विट करत लिहिलं – “In the end, INTENT always wins.” गंभीरांचा हा संदेश खेळाडूंना प्रोत्साहित करणारा आणि प्रतिस्पर्ध्याला उत्तर देणारा ठरला.
ट्रॉफीवरून मैदानात गदारोळ
अंतिम सामन्यानंतर मात्र ट्रॉफी वितरणावेळी अनपेक्षित गोंधळ निर्माण झाला. एसीसीचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड प्रमुख मोहसीन नक्वी यांच्या हस्ते भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर जवळपास दीड तास मैदानात नाट्यमय वातावरण होते. भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांकडून स्वीकारली. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने उपविजेतेपदाचा धनादेश नक्वींकडून घेतला.
यादरम्यान, नक्वी आशिया कपची ट्रॉफी आणि भारतीय खेळाडूंची मेडल्स घेऊन मैदानातून निघून गेले. त्यामुळे चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, संपूर्ण घटनेमुळे स्पर्धेच्या अंतिम क्षणांवर गालबोट लागले.