थोडक्यात
आज ऐतिहासिक सामना पाहायला मिळणार आहे.
भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश पुन्हा आमनेसामने येणार आहेत.
मात्र पाहिल्यास भारताची दुबईतील कामगिरी फारशी समाधानकारक दिसत नाही.
आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामना हा दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी मोठा क्रिकेट सोहळा ठरणार आहे. रविवारी, 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत रंगणार आहे. मात्र आकडेवारीकडे पाहिल्यास भारताची दुबईतील कामगिरी फारशी समाधानकारक दिसत नाही.
आजवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. त्यापैकी तीन सामने दुबईत रंगले. दुर्दैवाने, या तीन सामन्यांपैकी पाकिस्तानने दोन वेळा बाजी मारली, तर भारताला केवळ एकदाच विजय मिळवता आला. विशेष म्हणजे, 2021 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताला दुबईत 10 विकेट्सने पराभूत करून धक्का दिला होता.
यानंतर 28 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाच विकेट्सने विजय मिळवत परतफेड केली. पण तिसऱ्यांदा, 4 सप्टेंबर 2022 रोजी पाकिस्तानने पुन्हा पाच विकेट्सने जिंकत वर्चस्व प्रस्थापित केले. म्हणजेच दुबईच्या मैदानावर पाकिस्तानचा पलडा जड ठरला आहे.
आता आशिया कप 2025 मधील हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. भारताने गटसाखळीत यूएईवर मोठा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने ओमानवर सहज मात केली आहे. त्यामुळे रविवारीच्या सामन्यात कोण वरचढ ठरणार, आणि भारताला दुबईतील निराशाजनक आकडेवारीत बदल घडवता येणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.