Uddhav Thackeray on Jitendra Awhad vs Gopichand Padalkar Vidhansabha Rada : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्य विधानभवनात घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या वादाचे पडसाद आज विधानभवनाच्या परिसरात कार्यकर्त्यांमधील हाणामारीत उमटले. या घटनेवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली.
माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, “हे समर्थक आहेत की गुंडे? आणि जर ही परिस्थिती आपल्या राज्यात उद्भवली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय उरतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “ज्यांनी या व्यक्तींना पास दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मग ते कोणीही असो. अध्यक्षांनी जर दिशाभूल केली गेली असेल, तर तेही गंभीर विषय आहे,” असे सांगत विधानभवनात झालेल्या गोंधळाचा मुद्दा केवळ आमदारांपुरता मर्यादित न ठेवता, त्याच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचे ठामपणे व्यक्त केले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “विधानभवनात मारामारी आणि आमदारांवर धक्काबुक्की ही गुंडगिरी जर पोहोचली असेल, तर ती अतिशय गंभीर बाब आहे. अशा गुंडांवर आणि त्यांच्या पोशिंद्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे तरच मुख्यमंत्री हे जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे राहतील.
आपली संतप्त भावना व्यक्त करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “विधानभवन हे सर्वांत पवित्र मंदिर आहे. अशा ठिकाणी जर पास घेऊन गुंड येत असतील, तर त्यामागे कुणाचा हात आहे हे उघड झालं पाहिजे. हे काही व्यक्तिगत वाद नव्हते. हे राज्याच्या संसदीय मूल्यांवरच आघात करणारे आहे.”
आव्हाड-पडळकर प्रकरणाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, “कालच दोघांमध्ये शिवीगाळ झाली. आज कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. विधानभवनाच्या परिसरात जर लोकप्रतिनिधींना असुरक्षित वाटत असेल, तर त्याचा अर्थ व्यवस्थाच ढासळली आहे.”
यावेळी त्यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावरही टीकास्त्र सोडले. “काही दिवसांपासून अशा घटना घडत आहेत. तरीही कारवाई का होत नाही? ह्या गुंडांना संरक्षण देणारे कोण? पास कुणी दिले? हे सर्व तपासले गेले पाहिजे. विधानभवनाच्या कडेकोट सुरक्षेच्या छायेत जर ही घटना घडते, तर ते अधिक धक्कादायक आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून तातडीने कठोर निर्णय घेण्याची मागणी केली.