गाडी चालवताना मोबाइलवर बोलणं तुमच्यासाठी अत्यंत महागात पडू शकतं. केवळ दंड भरावा लागतो असं नव्हे, तर आता अशा बेशिस्त वाहनचालकांचे लायसन्स थेट निलंबित करण्याची कारवाई प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) करत आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आणि वाहतूक नियमांकडे होणाऱ्या दुर्लक्षाला आळा घालण्यासाठी ही कठोर पावले उचलण्यात येत आहेत. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणं, हेल्मेटशिवाय प्रवास करणं, तीन जणांना दुचाकीवर बसवणं, सीटबेल्ट न लावणं, वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा माल घेणं अशा विविध प्रकारच्या वाहतूक नियमभंगांविरोधात आरटीओ कार्यालयाकडून दंडात्मक आणि थेट परवाना निलंबनाची कारवाई केली जाते.
आरटीओच्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या बेशिस्त वाहनचालकांविरोधात दर महिन्याला सरासरी 8 ते 10 लायसन्स निलंबित केले जातात. काही महिन्यांमध्ये ही संख्या 15 ते 20 पर्यंतही पोहोचते. ही कारवाई संबंधित वाहनचालकाच्या नोंदणी क्रमांकावर आधारित असते आणि त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली जाते. वाहन चालवताना मोबाइलवर बोलल्यामुळे वाहनचालकाचे लक्ष रस्त्यावरून हटते आणि अनेकदा गंभीर अपघात घडतात.
विशेषतः दुचाकीस्वार मोबाईलवर बोलताना अपघात होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण होतो. तसेच एखाद्या वाहनचालकावर तीनवेळा लायसन्स निलंबनाची कारवाई झाली, तर त्याचे परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. यामुळे वाहनचालकाला वाहन चालवण्याचा अधिकारही गमवावा लागू शकतो.
दरवर्षी हजारो अपघात हे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे घडतात. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात तर अनेक जण अपंगत्वाला सामोरे जातात. त्यामुळे प्रशासन वारंवार नियम पाळण्याचे आवाहन करत असून, जनजागृतीसाठीही विविध मोहिमा राबवल्या जात आहेत. वाहन चालवताना थोडा संयम, शिस्त आणि नियम पाळल्यास अपघातांचे प्रमाण लक्षणीय कमी होऊ शकते. लायसन्स निलंबित होण्याच्या टप्प्यावर न येता, सुरुवातीलाच जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. तर पुढच्या वेळी गाडी चालवताना मोबाईल वाजला... थांबा, गाडी बाजूला लावा आणि मगच कॉल उचला! कारण तुमचा लायसन्स तुमच्याच हातून हरवू नये!
आरटीओचे अधिकारी सांगतात की, “मोबाईलचा वापर वाहन चालवताना करणं केवळ नियमभंग नाही, तर तो जीवाशी खेळ आहे. त्यामुळे अशा प्रकारची शिस्त मोडणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई आवश्यक आहे.”