राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध देखील पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळादरम्यान अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेली शिवसेना ठाकरे गट आणि वंचित युती अखेर झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण एकदम ढवळून निघाले आहे. या दोन्ही पक्षांच्या युतीवर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यावरच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. सोबतच त्यांनी वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना सल्ला देखील दिला.
काय म्हणाले अतुल भातखळकर?
2019 ला मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय संघर्ष आणखीच वाढल्या. या दोन्ही पक्षात वादादरम्यान अनेकदा एकमेकांवर खंजिर खुपसल्या गेल्याचा आरोप देखील करण्यात आला. त्यातच आज झालेल्या शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीवर अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. सोबतच त्यांनी वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना सल्ला देखील दिला. प्रकाश आंबेडकर यांनी यापुढे काळजी घ्यावी, खंजीरापासून सुरक्षेसाठी चिलखत घालून फिरावे. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.