राजकारण

मी बेळगावात जाणारच; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर चंद्रकांत पाटलांचा निर्धार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कर्नाटक सरकार महाराष्ट्राला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही आहे. काल जत तालुक्यात पाणी सोडल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटलांना बेळगावाला पाठवू नये, असा संदेशच बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सचिवांना पाठविल्याचे वृत्त आहे. मात्र, चंद्रकांत पाटलांनी हे वृत्त फेटाळून लावले असून मी ६ तारखेला जाणारच, असा निर्धार त्यांनी केला आहे.

महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमा भागावरील बेळगावचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई यांची नियुक्ती केली आहे. यानुसार चंद्रकांत पाटील उद्या बेळगाव दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना बेळगावाला पाठवू नये, असे कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना संदेश पाठवला आहे, अशी माहिती बोम्मई यांनी दिली.

यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मला कुठलाही फॅक्स आला नाही. मी ६ तारखेला जाणार आहे. आंबेडकरवादी यांच्या कार्यक्रमाला मी जाणार आहे. आम्ही संघर्ष करायला आलो नाही. ८६५ गावांना काय सोयी-सुविधा देऊ शकतो यासाठी येणार आहोत. कर्नाटक सरकार तुम्ही कशाला संघर्ष वाढवता आहात? आम्ही आमची भूमिका मांडायला जाणार आहोत. आम्ही कोणाच्या धमक्यांना घाबरत नाहीत, असे त्यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, सध्या दोन्ही राज्यातील परिस्थिती लक्षात घेता चंद्रकांत पाटलांनी बेळगावला येऊ नये, अशी विनंती कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी एका संदेशाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाला केली आहे. यापूर्वीही अनेकदा अशा पद्धतीचे प्रयत्न झाले असले तरी कर्नाटक सरकारने त्याविरुद्ध जे क्रम घेतले तेच क्रम यावेळीही घेतले जातील, असे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. तर, यापुर्वी जतच्या सीमावर्ती भागातील 40 गावावर दावा करणाऱ्या कर्नाटकने बुधवारी तुबची योजना सक्रिय करत पाणी जत पूर्व भागात सोडले आहे. यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात ओवरफ्लो झाला आहे.

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या रमेश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना दिलासा, विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे

2017मध्ये राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं? सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला थेट सांगितलं

निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश