सतेज औंधकर | कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुका असुदेत किंवा मुंबई महानगरपालिका निवडणूक आता फक्त भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेचाच झेंडा फडकणार, असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आता मुंबई महापालिकेवर लक्ष असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते.
राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचा सुद्धा मोठा विजय होताना दिसत आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी यापुढे फक्त भाजप आणि शिंदे यांच्या गटाचाच झेंडा लागणार असल्याचे त्यांनी म्हंटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातील 70 हुन अधिक अंगणवाडींना आवश्यक साहित्य आणि पोषण आहार वाटण्यात आले.
दरम्यान, राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 51 तालुक्यांतील 608 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी आज होत आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच पदासाठीच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. विशेष म्हणजे थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.