मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच चर्चेत आहे. शरद पवार यांनी त्यांच्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पवारांनी निर्णय मागे घेतला. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षाचा वारसदार ठरविण्यात अपयश आल्याची टीका सोमवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली होती. याच टीकेला आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय दिले पवारांनी प्रत्युत्तर?
आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी सामन्यातील टीकेचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की,'सामनातील अग्रलेखाला आम्ही महत्त्व देत नाही. त्यांना काहीही लिहू दे. आम्ही आमचं काम करत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही काय करतो, हे त्यांना माहिती नसतं. मात्र, आम्ही काय करतो हे आम्हाला ठाऊक असतं', असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.
नेमकी काय होती सामनामधील टीका?
'शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. मात्र, पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहे. त्यामुळेच निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला'. अशी टीका पवारांवर सामनामधून करण्यात आली होती.