Sharad Pawar | BhagatSingh Koshyari
Sharad Pawar | BhagatSingh Koshyari  Team Lokshahi
राजकारण

राज्यपालांची हकालपट्टी करा, नाही तर महाराष्ट्र पेटून..राज्यापालांवर पवारांचा निशाणा

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्याचे सत्र सुरु आहे. तर दुसरीकडे राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. याच सर्व विषयावरून महाविकास आघाडीकडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मविआतील नेत्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. याच मोर्चात बोलताना राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपालांवर टीकास्त्र लादले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

महाराष्ट्रातील काही सन्मान चिन्हं आहेत. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील हे सन्मानीय स्थानं आहेत. त्यांच्याबद्दल काहीही बोलतात. राज्यात असा राज्यपाल पाहिला नाही. शंकरदयाळ शर्मांपासून अनेक राज्यपाल पाहिले. या राज्यपालांनी महाराष्ट्राचा नावलौकीक वाढवला. पण आजचे राज्यपाल महाराष्ट्राच्या विचारधारेला संकटात नेत आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

आजचे राज्यपाल सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्याबद्दल बाष्कळ विधान करतात. त्यांना शरम वाटली पाहिजे. महात्मा फुले यांनी आधुनिक विचार दिला. सामान्य माणूस, शेतकऱ्यांसाठी काम केलं. थोर नेते आणि समाजसुधारक म्हणून फुले यांचं नाव आहे, मी उत्तर भारत आणि दक्षिण भारतात जातो तिथं महात्मा फुले यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठं काम केलं. त्यांच्याबाबत राज्यपालांकडून टिंगलटवाळी केली जात असेल तर राज्यपालांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. लोकशाहीच्या मार्गाने संदेश देतो, राज्यपालांची हकालपट्टी करा. आज लोक शांत आहेत. तुम्ही हकालपट्टी केली नाही तर महाराष्ट्र पेटून उठल्याशिवया राहणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

पुढे ते म्हणाले की, तसेच राज्यपालांना हटवलं नाही तर आगामी काळात आम्ही एकत्र बसू आणि काय कार्यक्रम करायचा हे ठरवू, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. तसेच राज्यातील जनता आता शांत बसणार नाही. हा इशारा आहे. त्यातून बोध घेतला नाही तर लोकशाही मार्गातून काय धडा शिकवायचा तो शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

आज ही गर्दी राज्याच्या कानाकोपऱ्यातून एकत्र का आली? त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान. आज महाराष्ट्राचा सन्मानावर हल्ला होत आहे. आज जे सत्तेत आहे. राज्याची सूत्रे ज्यांच्या हातात आहे तेच लोक महाराष्ट्रातील युगपुरुषांबद्दल वेगळी भाषा वापरत आहे. या देशात अनेक राजेराजवाडे होऊन गेले. अनेकांची संस्थाने झाली. पण साडेतीन वर्ष झाली तरी सामान्य माणसाच्या हृदयावर एक नाव आहे. ते म्हणजे शिवाजी महाराजांचं. त्यांच्याबद्दल मंत्री अनुद्गार काढतो. इतर नेतेही अवमान करतात ते महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, असंही पवारांनी ठणकावलं.

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या रमेश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना दिलासा, विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे

2017मध्ये राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं? सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला थेट सांगितलं

निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश