राजकारण

...तर हे खपवून घेतलं जाणार नाही; कर्नाटक निवडणुकीवरुन राज ठाकरेंचा इशारा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कर्नाटक निवडणुकीचे वातावरण तापले असून सर्वपक्षीयांनी प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक निवेदन जारी केले आहे. कर्नाटकमधील सरकार मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल, तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. तसेच, मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा, असे आवाहनही सीमावर्तींना केले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या १० मे ला मतदान आहे. तिथल्या सीमाभागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझं आवाहन आहे की मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्या पक्षाचा का असेना तो मराठी असायला हवा, आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरु असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरु असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय ह्याविरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.

तुम्ही ज्या राज्याचे आहात, त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृती ह्याचा आदर केलाच पाहिजे, ह्या ठाम मताचा मी आहे. सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृती ह्याचा मान राखत आले आहेत. पण तरीही तिथलं सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल, मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही.

मध्यंतरी जेव्हा पुन्हा एकदा सीमावादाला कर्नाटक सरकारकडून खतपाणी घालून वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा मी म्हणालं होतं की कर्नाटक आणि महाराष्ट्रात मुळात एकजिनसीपणा आहे. इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. तेव्हा खरंतर कर्नाटक सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली तर संघर्षाची वेळच येणार नाही.

पण कुठल्याही पक्षाचं सरकार तिकडे येऊ दे त्यांच्या वागण्यात यत्किंचितही फरक नसतो. म्हणूनच तिथल्या विधानभवनात मराठी भाषिक आमदार, जो त्या भागातील मराठी अस्मितेचं प्रतिनिधित्व करेल, मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवेल अशी लोकं असायला हवीत. ह्यासाठी सीमाभागातील लोकांना १० मे ला संधी आहे. मराठी आमदारच निवडून येतील हे तुम्ही पाहायला हवं, हे तुमच्या आणि पर्यायाने मराठी भाषेच्या हिताचं आहे. ही संधी दवडू नका, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...

Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या रमेश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Patil: अभिजीत पाटील यांना दिलासा, विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई मागे

2017मध्ये राष्ट्रवादीचं काय ठरलं होतं? सुनिल तटकरे यांनी लोकशाहीला थेट सांगितलं

निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश