अभिराज उबाळे | पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे अस्वस्थ आहेत. प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण आम्हाला मिळाल्यानंतर त्यांच्या अस्वस्थतेमध्ये वाढ झाली. आता तर आमचा अयोध्या दौरा यशस्वी झाल्याने येत्या काही दिवसांमध्येच संजय राऊत हे मुंबईच्या रस्त्यांवर दगड मारत फिरतील, अशी बोचरी टीका शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यामध्ये काही आमदार अस्वस्थ असल्याने गेले नसल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. आमदार शहाजी बापू पाटील हे देखील आयोध्या दौऱ्याला गेले नव्हते. सांगोल्यामध्ये ग्रामीण साहित्य संमेलन असल्याने आपण आयोध्या दौऱ्यावर गेले नसल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही अस्वस्थ होतो. मात्र आता आमची भाजपबरोबर नैसर्गिक युती झाल्यामुळे मतदार संघाला मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय मतदार संघाचा विकास होतोय. त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. संजय राऊत यांचं अस्तित्व हे आभाळातील एका टिकली प्रमाणे आहे, अशी जोरदार टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, संजय राऊतांनी एक मोठा गट या दौऱ्याला गेला नाही तो अस्वस्थ आहे काहीतरी गडबड सुरू आहे ती काय गडबड आहे हे तुम्हाला लवकरच कळेल. शक्ती प्रदर्शन ठाण्याच्या नाक्यावर देखील होऊ शकते. गद्दारांना लोकांनी पकडून रस्त्यावर मारलं पाहिजे असे म्हणत हल्लाबोल केला होता.