राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु असताना ‘सी-वोटर’च्या सर्व्हेमुळे गदारोळ निर्माण झाला आहे. या सर्व्हेमध्ये शिंदे गट-भाजपाच्या जागा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे एकच टीका करण्याचे सत्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुरु झाले आहे. या दरम्यान, मविआने सध्याच्या जागा राखल्या तरी खूप झाले. अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गट आमदार संजय शिरसाट यांनी या सर्व्हेवर भाष्य केले आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट?
‘सी-वोटर’च्या सर्व्हेवर बोलताना शिरसाट म्हणाले की, सर्व्हेवर अंदाज बांधता येत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पावसात एक सभा झाली होती. त्या सभेने सगळे गणित बदलून टाकले. त्या सभेने सर्व सर्व्हे गुंडाळून टाकले होते. त्या सभेनंतर पश्चिम महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार झाले होते. तेथील उमेदवारदेखील पावसाला आताच यायचे होते का? असे म्हणत होते. सर्व्हेचा अंदाज फक्त त्यांच्या समाधानासाठी चांगला आहे. असे शिरसाट म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, संजय राऊतांना या सर्व्हेमुळे खूप आनंद झाला असेल. मात्र प्रकाश आंबेडकरांनी त्यांना त्यांची लायकी दाखवली. महाविकास आघाडीमध्ये जेव्हा युती झाली होती, तेव्हाच मी म्हणालो होतो; की ही युती किती काळ चालेल हे सांगता येत नाही. लोकसभा निवडणूक सध्या दूर आहे. जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक होईल, तेव्हा यांच्यातील मतभेद बाहेर येतील. या मतभेदांनी आता टोक गठले आहे. आघाडीत कधीही बिघाडी होऊ शकते. असा दावा देखील शिरसाट यांनी यावेळी केला.