Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

मातोश्रीची दारे अडीच वर्ष आमच्यासाठी बंद होती, उद्धव ठाकरेंना आमदाराचे खरमरीत पत्र

Published by : Team Lokshahi

मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसैनिकांसाठी भाविनक आवाहन केले. त्या आवाहनानंतर वर्षा बंगला व मातोश्री निवासस्थानाबाहेर गर्दी झाली. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावर खरमरीत पत्र औरंगाबादचे आमदार संजय शिरसाठ यांनी दिले आहे. उद्धव ठाकरे यांना लिहिलेले हे पत्र एकनाथ शिंदे यांनी टि्वट केले आहे.

काय आहे पत्रात

श्री. उध्दवजी ठाकरे. मुख्यमंत्री, महाराष्ट्र.

आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय

पत्रास कारण की...

काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणा-या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आता नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामासाठी इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणीसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे, अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलय असा निरोप बडव्यांकडून यायचा. पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभ ठेवलं जायच. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.

तीन ते चार लाख मतदारांच्या मतदारामधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे ?

बडव्यांनी आपल्यापर्यंत कधी येऊ दिले नाही

हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान.. आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर वादरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.

आम्हाला अयोध्येला का जाऊ दिले नाही

हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वत: फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते. आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येता जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच मागितले की सीएम साहेबांचा फोन आला होता. आमदारांना अयोध्येता जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लोच दर्शन का घेऊ दिले नाही?

आम्हाला प्रवेश नाही पण काँग्रेस, राष्ट्रवादीला तुम्ही भेटत होते...

साहेब जेव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेव्हा आमचे खरे विरोध काँग्रेस राष्ट्रवादीचे तुम्हाला नियमित भेटन होते, मतदारसंघातली काम करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटन करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदार विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यागचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा.

शिंदेसाहेबांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी सतत उघडे

या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबानं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच हिंदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते. आजही आहेत आणि उद्याची राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.

काल आमच्या प्रश्नांना उत्तरेच दिली नाही...

काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणार हे भावनिक पत्र लिहावं लागलं.

कळावे, लोभ असावा.

संजय शिरसाट

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...