सध्या जोडप्यांबद्दल अनेक उलटसुलट चर्चा ऐकायला मिळतात. लग्न करणे सोपे पण निभावणे कठीण असेही अनेकदा म्हंटले जाते. तसेच लग्नानंतर अनेकदा सारसरच्या मंडळींकडूनदेखील मोठ्या प्रमाणात विवाहितेला त्रास देण्याच्या घटना ऐकायला मिळतात. आशातचा आता या सगळ्यातून मन सुखावणारी घटना समोर आली आहे.
बुलढाणा येथे एका महिलेच्या पतीच्या निधनानंतर तिच्याच सासू सासऱ्यांनी सुनेचे कन्यादान केले आहे. या कृतीचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लाडणापूर तालुक्यातील संग्रामपुर येथील सुनेचं लग्न लावून देऊन समाजाच्या डोळ्यांत चांगलंच अंजन घातलं आहे. या दिवशी स्वातीला पुन्हा नव्याने जीवनसाथी मिळाला आहे. किनखेड पूर्णा तालुका अकोट येथे हा आदर्श विवाह आप्तस्वकीय यांच्या सहज उपस्थितीत पार पडला.
स्वातीचा प्रथम विवाह सदन शेतकरी कुटुंबातील जगदीश केशवराव धनभर यांच्या समवेत 14 जुलै 2013 रोजी पार पडला होता. त्याना भक्ती आणि प्रसाद अशी दोन मुलं देखील आहेत. शेती, ट्रॅक्टर असं सर्व काही असलेले शेतकरी जगदीश इतर भावांप्रमाणे विभक्त कुटुंबात गावातच राहत होते. मात्र 13 ऑगस्ट 2023 रोजी विजेचा धक्का लागून जगदीश यांचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर संकट कोसळले.
आता सुनेला दुखातून बाहेर काढण्यासाठी धनभर यांनी स्वातीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. बुलढाण्यातील सासू-सासऱ्यांनी संपत्तीसह कन्यादान केले. त्यामुळे शेतकरी सासरे केशवराव धनभर यांच्या दातृत्त्वाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.