महाराष्ट्रात मे अखेरीस पावसाने चांगलाच जोर धरला असून, अनेक भागात मुसळधार पावसामुळे धरणं भरून वाहू लागली आहेत. विशेष म्हणजे, अनेक लहान-मोठी धरणं मे महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरली आहेत, ही बाब राज्यासाठी अभूतपूर्व ठरत आहे.
गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामध्ये विशेषतः मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत 6 मेपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच जोर धरला आहे. 27 ते 28 मे या कालावधीत केवळ 24 तासांत विभागात सरासरी 23.6 मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक 44 मिमी पाऊस जालना जिल्ह्यात तर नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही पावसाचा प्रभाव जाणवला. या पावसामुळे मराठवाड्यातील सुमारे 680 गावांमध्ये अतिवृष्टी झाली असून, काही ठिकाणी 65 मिमीहून अधिक पाऊस नोंदवण्यात आला.
बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे. पहिल्यांदाच मे महिन्यात हे धरणं ओव्हरफ्लो झाले असून, यामुळे बीड शहराचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. मात्र, धरणाजवळ काही तरुण सेल्फी घेण्यासाठी अनावश्यक धाडस करत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांगनदीवरील महींद धरण सलग आठ दिवस पडलेल्या पावसामुळे भरले असून, त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. 85 दशलक्ष घनफुट क्षमतेचे हे धरण 362 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा पुरवते. मे महिन्यातच धरण भरल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या अनपेक्षित पावसामुळे जलसाठ्यात वाढ होऊन पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे, मात्र संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी दक्षता घेणेही तितकेच गरजेचे आहे.