नांदेड लोकसभा मतदारसंघात प्रताप पाटील चिखलीकर भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांदेडच्या सभेत विरोधकांवर तोफ डागली आणि चिखलीकरांना विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केलं. नांदेडचा प्रत्येक युवक काश्मीरसाठी लढायला तयार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष अर्धा उरलाय. उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली शिवसेना. महाराष्ट्राचा विकास मोदी, शिंदे फडणवीस, अजित पवारच करु शकतात. उद्धव ठाकरे, शरद पवार महाराष्ट्राचा विकास करु शकत नाहीत. सत्तेत असताना शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिलं? असा थेट सवाल शहा यांनी उपस्थित केला आहे.
नांदेडच्या महायुतीच्या सभेत अमित शहा म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशाता सामाजिक क्रांती आणली. प्रताप पाटील चिखलीकरांना विजयी करण्यासाठी दिल्लीहून नांदेडला आलो आहे. वातावरण बदलल्यामुळे देशात ४०० पार होणार. राज्यात दोन पक्ष नकली आहेत. एक राष्ट्रवादी आणि दुसरी शिवसेना. तीन तिघाडा काम बिगाडा, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे चिखलीकरांना विक्रमी मताधिक्क्यांनी विजयी करा. कलम ३७० हटवून मोदींनी काश्मीरला भारताचा हिस्सा बनवला. मोदी सरकारमुळे पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं.
पाकिस्तानला घरात घुसून मारलं. पुलवामा, उरीनंतर पाकिस्तानच्या घराघरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. भाजपच्या काळात नक्षलवाद संपला. काँग्रेसने ७० वर्षांपासून राममंदिर अडकवून ठेवलं होतं. काँग्रेसने रामलल्ल प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण नाकारलं. मोदींनी २२ जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. या निवडणुकीनंतर इंडिया आघाडीत मतभेद होतील आणि इंडिया आघाडी फुटेल, असंही शहा म्हणाले.