Maharashtra Winter Update Maharashtra Winter Update
ताज्या बातम्या

Maharashtra Winter Update : थंडीचा पुन्हा जोर! महाराष्ट्रातील हवामानात बदल, 8 जिल्ह्यांना गारठीचा सामना

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल जाणवत आहे. तापमानात अचानक घट झाल्यामुळे अनेक भागांत गारठा वाढला आहे. उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड हवेच्या लाटांमुळे ही थंडी वाढली

Published by : Riddhi Vanne

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल जाणवत आहे. तापमानात अचानक घट झाल्यामुळे अनेक भागांत गारठा वाढला आहे. उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड हवेच्या लाटांमुळे ही थंडी वाढली असून, पुढील काही दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मात्र, थंडीसोबतच हवेतील वाढते प्रदूषण नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मुंबईत धुक्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर होत असून, पुण्यात श्वास घेण्यास त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात मागील दोन दिवसांपासून पहाटे दाट धुकं पसरलेलं दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील २४ तास मुंबईत गार वातावरण राहणार आहे. शहरात कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंशांच्या आसपास नोंदवण्यात आलं आहे. सकाळी ५ ते ९ या वेळेत धुक्यामुळे रस्त्यांवरील दृश्य स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे वाहन चालवताना चालकांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. अपघात टाळण्यासाठी सावध राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पुणे शहरात गेल्या आठवड्यापासून हवेची गुणवत्ता खालावली आहे. वाढती वाहतूक, सुरू असलेली बांधकामं आणि हिवाळ्यातील स्थिर हवा यामुळे प्रदूषण हवेतच अडकून राहत आहे. अनेक भागांत हवा गुणवत्ता निर्देशांक १८० पेक्षा जास्त नोंदवला गेला आहे. त्यामुळे काही नागरिकांना दम लागणे, डोळ्यांत जळजळ होणे असे त्रास जाणवत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी शहरावर धुकं आणि धुराचं मिश्रण दिसून येत असून, हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

हवामान खात्याने उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत थंडी आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा परिसर, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत तापमान लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली असून, याचा परिणाम शेतीवर होऊ शकतो.

तज्ज्ञांचा सल्ला:

  • ज्यांना दमा किंवा श्वसनाचे आजार आहेत त्यांनी पहाटे बाहेर जाणं टाळावं.

  • बाहेर पडताना मास्क वापरणं फायदेशीर ठरेल.

  • धुक्याच्या वेळी वाहन चालवताना हेडलाईट आणि फॉग लाईट सुरू ठेवावेत.

  • दिवसाच्या वेळेत उष्णता जाणवू शकते, त्यामुळे पाणी भरपूर पिणं आवश्यक आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा