मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आक्रमक झालेले मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिला आहे. “भुजबळांना जे करायचं ते करू द्या, पण जितका त्रास मराठ्यांना दिला जाईल तितके मराठे खोलात घुसतील,” असे जरांगे म्हणाले.
छगन भुजबळ यांनी नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या चिंतन शिबिरात भूमिका मांडताना, “गरज पडली तर दिल्लीपर्यंत जाऊन ओबीसी आरक्षणासाठी लढू,” असा निर्धार व्यक्त केला होता. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने काढलेला शासन निर्णय ओबीसींच्या हक्कांवर गदा आणणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जरांगे म्हणाले की, मराठ्यांनी कधीच कुणाच्या आरक्षणाला विरोध केलेला नाही. मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाला अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला तर मराठेही ठामपणे उत्तर देतील.
मनोज जरांगे यांनी यापूर्वीच दिल्लीकडे मोर्चा नेण्याचा इशारा दिला आहे. ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना आरक्षण मिळावे, या मागणीवर ते ठाम आहेत. हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या आधारे कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांची नोंदणी शासनाने सुरू केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काहींना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
दरम्यान, या प्रश्नावरून मराठा आणि ओबीसी समाजात तणाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः मराठवाड्यातील काही भागांत या मुद्द्यावर हालचाली सुरू झाल्याचे दिसत असून, सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी गावागावांतून एकतेचा संदेश देण्याची गरज असल्याचे ज्येष्ठांचे मत आहे.
राज्यातील आरक्षणाचा वाद पुन्हा चिघळला असून, मराठा-ओबीसी संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.