मुंबईत प्रस्तावित बिहार भवनावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्र कुणाच्या मालकीचा नाही. बिहार भवन आम्ही नक्की उभारणार,” असे म्हणत त्यांनी टीकेची झोड उठवली. त्यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
या आरोपांना मनसेकडूनही तितकेच ठाम प्रत्युत्तर देण्यात आले. मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी बिहार सरकारवरच बोट ठेवत, “आधी स्वतःच्या राज्यात रोजगार निर्माण करा. लोक महाराष्ट्रात का येतात, याचा विचार करा,” असा पलटवार केला. राज ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीचा उल्लेख करत त्यांनी त्यांच्या नेतृत्वाचे कौतुकही केले.
दरम्यान, या मुद्द्यावर काँग्रेसने वेगळी भूमिका मांडली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, “जर हा खरोखर सांस्कृतिक उपक्रम असता, तर पटनामध्ये महाराष्ट्र भवनाचाही विचार झाला असता,” असे म्हणत या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला.
यातच भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांनी मनसेला टोला लगावत, “बिहार भवनाला विरोध करण्यापेक्षा मनसेने स्वतःचे भवन उभारावे,” अशी खोचक टिप्पणी केली. एकूणच, एका इमारतीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ उठताना दिसत आहे.
थोडक्यात
मुंबईत प्रस्तावित बिहार भवनावरून राजकीय वाद पेटू लागला
बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल
“महाराष्ट्र कुणाच्या मालकीचा नाही,” असे विधान करत राज ठाकरे यांच्यावर टीका
मुंबईत बिहार भवन उभारण्यावर ठाम असल्याचे अशोक चौधरी यांचे स्पष्ट मत