मुंबई, ता. १२ : वीस वर्षांपूर्वी राजकीय वादातून दादर परिसरात जमावाने केलेल्या हिंसाचार प्रकरणातून खासदार रवींद्र वायकर आणि तत्कालीन शिवसेनेच्या २८ कार्यकर्त्यांची विशेष न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. खासदार आणि आमदारांविरुद्ध दाखल खटल्यांचे कामकाज पाहणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी याप्रकरणी निकाल देताना वायकर आणि अन्य आरोपींची दंगल, बेकायदा सभा आणि इतर आरोपांतून निर्दोष सुटका केली.
विद्यमान आमदार (ठाकरे गट) महेश सावंत आणि माजी नगरसेविका विशाखा राऊत यांचा वायकर यांच्याशिवाय इतर आरोपींमध्ये समावेश आहे. बेकायदा जमावाचा आरोपी दंगल करणाऱ्याभाग होते की नाही, हे निश्चितपणे सांगता येणार नाही, न्यायालयाने असेही आरोपींची सुटका करताना नमूद केले. राजकीय शत्रुत्वामुळे दोन राजकीय गटांमधील संपूर्ण मुंबई शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता; न्यायालयाने मात्र आरोपी सहभागी असल्याची ओळख न पटल्यामुळे त्यांची सुटका करीत असल्याचेही निकालात म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २४ जुलै २००५ मध्ये दादर येथील जाखादेवी चौकात निदर्शनासाठी जमाव जमला होता. काही वेळाने हिंसक झालेल्या जमावाने पोलिसांवर, त्यांच्या गाड्यांवर आणि बेस्ट बसवर दगडफेक केली. परिणामी, परिसरात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली. याप्रकरणी वायकर आणि अन्य आरोपींवर दंगलीचा गुन्हा दाखल केला होता.