काँग्रेस नेते नाना पटोले यांनी काल जनतेला होळीच्या शुभेच्छा देताना म्हटले की, "भाजपबरोबर जाऊन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची फार वाताहात होत आहे. त्यामुळे माझा त्यांना सल्ला असा असले की, आपण पुन्हा सरकार बनवू. काँग्रेसकडे या तुम्ही. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे. परवा अजित दादा एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यांना पहिल्या नंबरच्या खुर्चीवर जाण्याचं वेध लागलं आहे." "एकनाथ शिंदे यांना वाटते की माझ्यामुळे सरकार आले, मला दुसऱ्या नंबरच्या खुर्चीवर टाकण्यात आलं. त्या दोघांच्या खुर्चीची हौस आम्ही पूर्ण करुन टाकू. दररोज त्यांचा अपमान होत आहे. अजितदादांना बिना पैशाचं बजेट मांडावा लागलं. त्यांना होणारा त्रास पाहता आम्ही त्यांना न्याय देऊ. बुरा ना मानो होली है" असे नाना पटोले म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, आता याच्यावर मी काय बोलू शकतो. माझी वाचा गेली आहे. नाना पटोले हे आमचे सहकारी आहेत. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपदसुद्धा भूषवलं आहे. राजकारणामध्ये काही अशक्य नसते. एवढेच मी सांगू शकतो.
2019साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार येईल असे कुणाला वाटलं होते का? त्यानंतर परत अडीच वर्षाने घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असं वाटलं होते का? त्यानंतर 2024साली इतकं मोठे बहुमत फडणवीसांना मिळेल हे कुणी स्वप्नात तरी पाहिलं होते का?
यासोबतच ते पुढे म्हणाले की, राजकारण आहे. राजकारणामध्ये सर्व शक्यता जास्त आहे. त्याचा सकारात्मक विचार करुन पाऊल टाकायचं असते असे मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. आता आमच्या नानासाहेब पटोलेंनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्विकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेंशी चर्चा करु. ज्या प्रकारचे राजकारण या महाराष्ट्रात सुरु आहे. ज्या घडामोडी आम्ही पडद्यामागे घडताना पाहतो. नाना पटोलेंनी लवकर भांडं वाजवलं, थोडं थांबलं पाहिजे होते. वर्षभरानंतर देशातलं राजकारण बदलणार आहे. असे संजय राऊत म्हणाले.