नागपूरमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. या महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नरहरी झिरवळ म्हणाले की, मी भुजबळ साहेबांना भेटलो. ज्या दिवशी ते खूप नाराज झाले. नागपूरमध्ये होते त्या दिवशी रात्री मी साहेबांना भेटलो. साहेबांना विनंती केली. साहेबांनी सांगितले नाही, मला अशा पद्धतीने जी वागणूक दिली मंत्रिमंडळापेक्षा मला ती वागणूक पटली नाही.
मी साहेबांना सांगितले आपण मोठे आहात. तुमच्याकडे देशपातळीवरचा नेता म्हणून पाहिलं जाते. ते म्हणाले जाऊ दे काय व्हायचे ते होईल. तर मग म्हटले तुम्ही आमच्यासाठी का होईना असा चुकीचा निर्णय तुम्ही घेणार नाही आम्हाला माहित आहे. छगन भुजबळ साहेबांना बाजूला ठेवणं कुणालाही परवडणारे नाही. हे सगळ्यांना माहित आहे. छगन भुजबळ भाजपबरोबर जाणार नाही, अजित दादांसोबतच राहतील. असे नरहरी झिरवळ म्हणाले.