संजय देसाई, सांगली
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रतीक पाटील यांची निवडणुकीतील ही इंट्री आहे. एकीकडे युवा नेत्याच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होत असतानाच. जयंत पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे दिलीप तात्या पाटील यांनी फेसबुक वर नाराजी पोस्ट टाकली आहे. निष्ठावंतांनाच पहिले संपवले जाते अशा आशयाची खळबळजनक पोस्ट व्हायरल झाल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आल आहे. नेमके दिलीप तात्या नाराज का आहेत आणि त्यांच्या टीकेचा रोक नेमका कोणावर आहे याबद्दल उलट सुलट चर्चा रंगली आहेत.
मुळात दिलीप तात्या पाटील हे लोकनेते राजारामबापू पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते. राजारामबापू पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर जयंत पाटील यांची राजकारणात इंट्री झाली. त्यांनीही सुरुवातीला साखर कारखान्याचे चेअरमन पद भूषवलं. पहिल्याच आमदारकीच्या निवडणुकीत ते विजयी झाले. सलग सातवेळा ते आमदार म्हणून जयंत पाटील हे निवडून आले आहेत. जयंत पाटलांची यशाची कमान वाढत असताना त्यांनी आपल्या आणि आपल्या वडिलांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मानसन्मान दिला, अनेक पद दिली.
ज्येष्ठ नेते दिलीप तात्या पाटील यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि पद जयंत पाटील यांनी दिली. सूतगिरणीचे चेअरमन पद, राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष पद आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन पद अशा अनेक सत्ता केंद्रात दिलीप तात्यांना खुर्चीवर बसवण्याचे काम जयंत पाटील यांनी केलं. मात्र आमदार की न मिळाल्यामुळे दिलीप तात्या पाटील यांनी नेहमी कुठे ना कुठे नाराजी व्यक्त केलेली आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दिलीप तात्या चेअरमन असताना त्यांच्या काळातील कामकाजाबाबत गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले. या बाबत चौकशा लागल्या. जयंत पाटील यांनी या चौकशींना स्थगिती सुद्धा मिळवली होती. मात्र राज्यात आता शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा एका मागून एक चौकशी बँकेच्या कारभाराबाबत लावण्यात आल्या आहेत. एकीकडे चौकशीमुळे चक्रव्यूहात अडकलेले दिलीप तात्या नाराज आहेत.
त्याचवेळी जयंत पाटील यांच्या पुत्राची निवडणुकीच्या रिंगणात इंट्री झालेली आहे. अनेक वर्ष राजारामबापू सहकारी साखर कारखान्यांच्या चेअरमन पदी असणाऱ्या पी आर पाटील यांना राज्य साखर संघाचे अध्यक्ष पद देण्यात आल आहे. या कारखान्याच्या निवडणुकीनंतर प्रतीक पाटील हे कारखान्याचे चेअरमन होतील अशी चर्चा रंगू लागली आहे. याच वेळेला टायमिंग साधत दिलीप तात्या यांनी पहिले निष्ठावंत संपवले जातात अशी फेसबुक पोस्ट टाकली आहे. दिलीपतात्या यांच्या फेसबुक पोस्टने खळबळ माजली असून, नेमकी नाराजी कोणा साठी हा सवाल आता उपस्थित केला जात आहे.