टोलनाक्यावरील लांबच्या लांब रांगा टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी फास्टटॅग पद्धतदेखील अनिवार्य केली. मात्र आता फास्टटॅगकरिता टोलनाक्यावरही गाड्यांना रांगेत उभं राहावं लागत आहे. त्यामुळे आता टोलनाकेच बंद व्हावेत यासाठी केंद्र सरकार नवीन उपाययोजना करणार आहे. याबद्दलची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
टोलनाक्याबद्दल नितीन गडकरी म्हणाले की, येत्या 15 दिवसांत अशी पॉलिसी आणणार आहे की टोलबद्दल तुमची कोणतीही समस्या असणार नाही. पण हे महाराष्ट्रातील टोलबद्दल नसून राष्ट्रीय महामार्गाबद्दल असणार आहे. त्याचप्रमाणे सॅटलाईट बेस फ्री टोलिंग सिस्टिम तयार करणार आहे. यामुळे टोलनाके राहणार नाहीत आणि तुम्हाला कोणी अडवणार नाही. कॅमेऱ्याद्वारे तुमच्या नंबरप्लेटवरून टोल निघेल. तुम्ही जिथून निघालात तिथपासून तुम्ही जिथून बाहेर पडाल तिथपर्यंतचाच टोल थेट तुमच्या बँक खात्यातून कापला जाणार". अशी माहिती त्यांनी दिली.