केंद्र आणि राज्य सरकारमधील असमन्वयाचा फटका राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांना बसतो आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ दिल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी दिली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांना दिलासा मिळाला.
मात्र, महाराष्ट्राच्या पणन विभागाकडे चौकशी केली असता, याबाबत कोणतीही माहिती किंवा सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिल्याची कोणतीही सूचना मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकाच विचारांचे सरकार असूनही केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असमन्वय असेल आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत असेल तर, याला जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
पणन विभागाचे स्पष्टीकरण
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला २४ दिवसांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तेलंगणातील सोयाबीन खरेदीला १५ दिवसांची मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी (ता.१०) दिली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नियमानुसार देय असलेला ९० दिवसाचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपल्यानंतर केंद्र शासनाने एकूण २४ दिवसांची मुदतवाढ दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दिली होती.
काही माध्यमांमधून सोयाबीन खरेदीस महाराष्ट्रात २४ दिवस व तेलंगणा मध्ये १५ दिवस मुदतवाढ देण्यात आल्याचे मा. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितल्याची बातमी आज देण्यात आली आहे. तथापि ही नव्याने देण्यात आलेली मुदतवाढ नसून सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाने दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ नंतर कोणतीही मुदतवाढ दिलेली नसल्याचे या अनुषंगाने राज्याच्या पणन विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.