दूध असो की पनीर, आपल्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत हे पदार्थ हवे असतात. सणसुद असो की रोजचं जेवण प्रत्येकाला दूध, दही आणि पनीरसारखे दुधाचे पदार्थ हवे असतात. तुमच्या-आमच्या आणि सर्वांच्याच आहारात रोज दूध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश असतो. अनेकदा आपण घरी किंवा हॉटेलमध्ये पनीर खातो. मात्र, या दूध आणि पनीरमध्ये भेसळ करणाऱ्यांचं मोठं रॅकेट कार्यरत आहे. मात्र, या दुधात विष कालवण्याचा प्रकार समोर आला. म्हणूनच, स्वत:च्या फायद्यासाठी लोकांच्या जेवणात विष कालवणाऱ्यांचा पर्दाफाश लोकशाही मराठी करत आहे. त्याचसोबत, आम्ही बनावट दूध आणि पनीर कसं ओळखावं, हे सुद्धा सांगणार आहोत.
भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे आणि हा गौप्यस्फोट तुमची आमची झोप उडवणारा आहे. कारण, विक्रमसिंह पाचपुतेंनी भेसळ केलेलं पनीर माध्यमांसमोर आणि थेट सभागृहातच धडधडीतपणे दाखवल आहे. बाजारात मिळणारं 70 टक्के पनीर हे भेसळ केलेलं असल्याचा दावा त्यांनी केला आणि खळबळ उडाली. महत्त्वाचं म्हणजे बाहेरच्या राज्यातून हे बनावट पनीर येत असल्याचा दावाही त्यांनी केला. आणि अशी भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप किंवा फाशी द्यायला हवी अशी आक्रमक मागणी त्यांनी केली.
महाराष्ट्रात रोज सुमारे 1 कोटी 70 लाख लिटर दुधाचं उत्पादन होतं. आणि महाराष्ट्राची रोजची दुधाची गरज ही 70 लाख लिटर इतकी आहे. त्यातून उरलेल्या १ कोटी लिटर दुधाचे रोज दूध पावडर, बटर, पनीर इत्यादी पदार्थ बनवले जातात. त्यामुळे इतक्या प्रमाणात जर दुधाची गरज असेल तर, त्यात होणारी भेसळ ही फार मोठ्या संकटाची ग्वाही असणार हे नक्की. त्यामुळे, तुमच्या आमच्या ताटात आणि दुधात स्वत:च्या तुंबड्या भरण्यासाठी विष कालवणाऱ्या या पुतना मावशीला चांगलाच धडा शिकवायला हवा. तोही असा की पुन्हा कुणी दुधात किंवा पनीरमध्ये भेसळ करण्यास धजावणार नाही.