"आपल्या देशाला जर जगाच्या पाठीवर मोठे करायचे असेल, भारत देशाला जर आर्थिकदृष्ट्या पुढे न्यायचे असेल, तर आता सीमेवरील केवळ जवानच नाही, तर प्रत्येक भारतीयांनी प्रयत्न केले पाहिजे. भारताला मोठं करणं ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी जनतेला केले. गांधीनगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळेला त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चे कौतुक करत स्वदेशीला स्वीकारा आणि परदेशी वस्तूंना 'बाय बाय करा', असेही ते यावेळी म्हणाले.
"2047 पर्यंत भारताला विकसीत करायचे असेल तसेच आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी आपण कोणतेही परदेशी वस्तू खरेदी करू नये," असे आवाहन पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी केले. "गावोगावी लोकांनी परदेशी मालामुळे फायदा होत असला तरी परदेशी माल घेणार नाही, अशी शपथ घेतली पाहिजे. होळीचे रंग आणि पिचकारीपर्यंत सर्व वस्तू परदेशातून आयात होत आहेत. आजकाल छोट्या डोळ्यांचे गणपती बाप्पा पण परदेशातून येत आहेत. या गणपतीचे डोळेसुद्धा उघडे नाहीत, या गोष्टींवर आळा घातला गेला पाहिजे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी परदेशी माल खरेदी न करण्याचे आवाहन केले.
"आज भारतात अनेक वस्तू तयार होत आहेत. प्रत्येक परदेशी गोष्टीला आपल्या भारतात पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही स्वदेशी वस्तूंचा वापर करा आणि त्यायोगे आपल्या रोजगाराच्या संधीही लोकांना उपलब्ध होतील. परिणामी, भारताची अर्थव्यवस्थाही बळकट होईल, यासाठी आपल्याला 'मेड इन इंडिया' ब्रँडचा अभिमान असायला हवा," असे आवाहन त्यांनी केले. 'ऑपरेशन सिंदूर'साठी सैन्यबळासह लोकशक्तीची पण गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.