महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवरहाऊस’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात अकाली निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर देशभरातून नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहूल गांधी यांनी देखील या दु:खद घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. राहूल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात निधनाची बातमी खूप वेदनादायक आहे. या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या प्रियजनांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.” हे ट्विट सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ठोस व्यक्तिमत्व मानले जात होते. उपमुख्यमंत्री, खासदार तसेच विविध मंत्रालयांमध्ये त्यांनी प्रशासनावर आपला ठसा उमटवला. त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, रोखठोक निर्णयक्षमता आणि जनतेशी थेट संपर्कामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. बारामती विमानतळाजवळ लँडिंगच्या प्रयत्नात असलेले विमान अचानक जमिनीवर कोसळले आणि आग लागून जळून खाक झाले. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरातून राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होऊ शकतो. पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी आता पवार कुटुंबाच्या वरिष्ठ सदस्यांवर येऊ शकते. राज्य आणि देशाच्या राजकारणावर अजित पवारांच्या निधनाचा मोठा परिणाम होईल, असा सर्वसामान्यांचे मत आहे. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे महाराष्ट्रातील अनेक योजनांचा फायदा जनतेपर्यंत पोहोचला, आणि त्यांच्या जाण्याने राज्यावर झालेला शोक अत्यंत भावनिक आहे.