भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा पराभव व्हावा असं जर का महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करू नये आणि मविआने मला पाठिंबा जाहीर करावा. मी पाठिंबा घ्यायला तयार आहे, परंतु मविआ आघाडीमध्ये येणार नाही ही माझी ठाम भूमिका आहे असा निर्धार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे. ते इस्लामपूर येथे माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले राजू शेट्टी?
आम्ही 2015 पासून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहोत. खरं तर या आधीपासूनच आम्ही भाजपचे विरोधक आहोत. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही, या आमच्या भूमिकेवर देखील आम्ही ठाम आहोत असे शेट्टी म्हणालेत. मागेच स्वाभिमानीच्या राज्य कार्यकारिणीमध्ये महाविकास आघाडीचे असणारे सगळे संबंध सोडून स्वाभिमानाने इथून पुढे ज्या काही निवडणुका लढवायच्या त्या स्वतंत्र लढवायच्या हा निर्णय घेतला होता. जवळपास तीन वर्षांपूर्वी मविआचे प्रमुख शरद पवार यांना आम्ही आघाडी का सोडतोय, याबाबत एक 9 पानी पत्र लिहले होते पण त्या पत्राची साधी दखलही मविआने घेतली नव्हती. त्यामुळे मविआ आघाडीमधून निवडणूक लढवायची नाही तर स्वतंत्र निवडणूक लढवायची हा निर्णय आम्ही घेतलाय आणि हा निर्णय आमचा आजही कायम असल्याचे शेट्टी म्हणालेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने हे खासदार आहेत. त्यांच्या विरोधात राजू शेट्टी हे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. ही जागा शिवसेनेकडे असल्याने महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी मागणी करत राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची दोन वेळा भेट घेतली होती. आपण महाविकास आघाडीमध्ये येणार नाही, पण आपल्याला पाठिंबा द्यावा अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतलीय.