छत्रपती संभाजीनगर शहराच्या उच्चभ्रू वसाहतीत घडलेल्या लड्डा बंगल्यावरील दरोड्याने आधीच खळबळ उडवून दिली असतानाच, आता या प्रकरणात नवा आणि गंभीर ट्विस्ट समोर आला आहे. सुरुवातीला सांगितलेल्या ५.५ किलो सोन्याच्या चोरीच्या आकड्याला छेद देत, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी "चोरीला गेलेल्या सोन्याचे प्रमाण हे १० किलोपर्यंत असू शकते," असा गंभीर दावा गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, “आज अखेर केवळ ३२ तोळे सोनं पोलिसांच्या ताब्यात आले असून, उर्वरित मुद्देमालाचा तपास अद्याप प्रलंबित आहे. वास्तविक चोरी किती झाली, हे स्पष्ट होण्यासाठी सखोल तपास गरजेचा आहे.” या संपूर्ण प्रकरणात पोलिस तपासाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित करण्यात आली आहे. "इतक्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल अद्याप सापडलेला नाही, हे चिंताजनक असून, तपासात गती आणणे अत्यावश्यक आहे," असे मंत्री शिरसाट यांनी ठामपणे स्पष्ट केले.
एन्काउंटरवरही प्रश्न; गुन्हेगारांचे कनेक्शन उघडकीस येण्याची शक्यता
दरोड्याच्या घटनेनंतर घडलेल्या पोलिस एन्काउंटरप्रकरणीही अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत आरोपीवर १० गुन्हे होते, तर दुसऱ्या आरोपीवर अंबाजोगाईत गुन्हे दाखल असल्याची माहिती यावेळी उघड झाली. या संदर्भात शिरसाट म्हणाले, “ही गाडी अंगावर घालण्याची पहिली घटना नव्हती. पोलिसांनी केवळ बचावासाठीच कारवाई केली. मात्र, यामागे कोणतेही अपारदर्शक निर्णय किंवा दबाव होते का, याची चौकशीही आवश्यक आहे.”
पोलिस आयुक्तांसोबतच्या भेटीनंतर मंत्री शिरसाटांनी दिलेल्या माहितीनुसार, “पोलिस आता अॅक्टिव्ह मोडमध्ये असून, लवकरच आणखी आरोपी अटकेत येतील. पोलिस दलातील कुणाचा सहभाग या प्रकरणात आढळल्यास, त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. या वक्तव्यामुळे यंत्रणेतील संभाव्य सांठगाठ आणि त्यावरील कारवाईकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
मामुली चोरी की व्यापक षड्यंत्र?
लड्डा बंगल्यातील चोरी आता केवळ एका गुन्हेगारी घटनेपुरती सीमित राहिलेली नाही. या मागे मोठे आर्थिक गैरव्यवहार, हितसंबंधांचे जाळे आणि संस्थात्मक लपवाछपवी असण्याची शक्यता अधिकच बलवत्तर होत आहे. सोन्याचे मूळ प्रमाण, त्याचे व्यवहारातील संदर्भ, आणि गुन्हेगारांचे नेटवर्क – या सगळ्यांची सखोल चौकशी केल्याशिवाय हे प्रकरण पूर्णत्वास जाणे अशक्य आहे.