उत्तर प्रदेश येथील चौघा साधूंना झालेल्या मारहाणीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी लवंगा गावातील एकूण 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सात जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे.
मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा इथं ही घटना घडली आहे. पोलीस चौकशीत गैरसमजुतीतून मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वाराणसी इथून चार साधू कर्नाटकात देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून ते लवंगामार्गे विजापूरला जात होते. त्यावेळी रस्त्यात गाडी थांबवून विजापूर रस्ता कोणता अशी विचारणा या साधूंनी एका तरुणाकडे केली.
मुलं पळवणारी चोरांची टोळी असा कन्नडमध्ये उल्लेख असलेला साधूचा एक व्हिडीओ तरुणानं पाहिला होता. त्या तरुणाकडेच या साधूंनी रस्त्याबाबत विचारणा केली. या व्हायरल व्हिडीओमुळे मुळं पळवणारी टोळीच असल्याची शंका आल्यानं तरुणानं ही बाब गावात कळवली. त्यानंतर या चारही साधूंना गाडीतून ओढून बेदम मारहाण करण्यात आली. काठी, पट्ट्यानं या साधूंना मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.