शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत येतात. विरोधी सरकारवर ते अनेकदा आरोपांचे ताशेरेदेखील ओढतात. अशातच आता त्यांनी डोंबिवली येथील अनधिकृत इमारत प्रकरणी त्यांनी सरकारला काही प्रश्न केले आहेत.
डोंबिवलीमधील अनधिकृत इमारत बांधकाम प्रकरणी संजय राऊत म्हणाले की, आशा वेळी सरकार काय करतं? हे सरकार जनतेने निवडून दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे नेहमी सांगतात . डोंबिवलीमध्ये 62 इमारतींवर बुलडोजर चालवला. यामुळे साडेसहा ते सात हजार कुटुंब रस्त्यावर आले. याची जबाबदारी कोणते सरकार घेणार आहे? बिल्डरने बनावट कागदपत्रे तयार करून राजकीय पाठबळ मिळवून शासकीय यंत्रणा ताब्यात घेतली. हजारो कुटुंब रस्त्यावर आली आहेत. याची वेदना सरकारला होत नाही का?
गौतम अदानीच्या प्रकल्पासाठी सरकार खुप मेहनत घेते मग डोंबिवलीच्या साडेसहा हजार कुटुंबासाठी काही केले असते तर ते लोक बेघर झाले नसते. त्या भागातील आमदार रवींद्र चव्हाण लोकांच्या भेटीदेखील घेत नाहीत. मस्सा जोग येथील सरपंचाच्या हत्येचा विषय घेत आहात. दुसरीकडे 6000 लोकांना बुलडोजरखाली चिरडून मारलं. अनेक वर्ष रवींद्र चव्हाण त्या भागातील आमदार आहेत. ते राजीनामा देणार का? हा विषय सरकारपर्यंत जावा यासाठी लोक आमच्याकडे येत आहेत. आम्ही जर रस्त्यावर आलो तर तुम्हीच आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराल.