मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देण्यात आलेला जामीन रद्द करण्यात यावा यासाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. राऊत यांच्या विरोधात पुरावे असूनही मुंबई सत्र न्यायालयानं त्यांना जामीन दिल्याचं सांगत ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान यावर काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले होते. त्यानंतर राऊतांची 9 नोव्हेंबर 2022 ला सुटका करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेनंतर जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनी जामीन मंजूर झाला. मात्र, ईडीनं कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.