Santosh Deshmukh case Mumbai High Court bench has rejected Walmik Karad bail application : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली. या घटनेनंतर काही धक्कादायक फोटो आणि मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर पसरले. त्यामुळे बीड जिल्ह्याबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आणि कायदा-सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले.
या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वातावरण तापलं. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले, तसेच मंत्रिपद सोडण्याची मागणीही जोर धरू लागली. अखेर तब्येतीचं कारण देत धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. याच काळात मनोज जरांगे पाटील यांनीही मुंडेंवर थेट टीका केली होती. मात्र, अलीकडेच झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निकालानंतर धनंजय मुंडे यांनी “जनतेने मला न्याय दिला आहे” असं वक्तव्य केलं.
दरम्यान, प्रचारादरम्यान धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांचा उल्लेखही केला होता. सध्या वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या कारागृहात आहे. या प्रकरणात त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे कराडला मोठा धक्का बसला आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशात असं नमूद केलं आहे की, खंडणी मागणं, सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्यानंतर हत्या या सर्व घटनांमध्ये वाल्मिक कराडचा सहभाग दिसून येतो. कॉल रेकॉर्ड्स, मोबाईलवरील संभाषण, इतर आरोपींशी झालेला सततचा संपर्क, जप्त करण्यात आलेले व्हिडीओ, आवाजाच्या नमुन्यांची तपासणी आणि प्रयोगशाळेचे अहवाल या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने जामीन नाकारला आहे. या निकालामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून, पुढील कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.