प्रशांत जगताप, सातारा
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियानात सातारा नगरपालिकेने देशपातळीवर अकरावा तर राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पालिकेने यापूर्वीही उल्लेखनीय कामगिरी केली होती. यावर्षी त्यामध्ये आणखी प्रगती झाली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात समाविष्ट बाबींची पूर्तता करत सातारा नगरपालिकेने एकूण 6 हजार गुणांपैकी 5 हजार 713 गुण प्राप्त केले आहेत. ही कामगिरी पालिकेसाठी देशपातळीवर अकराव्या तर राज्य पातळीवर तिसऱ्या क्रमांकाची ठरली आहे. यापूर्वी सातारा शहराला थ्री स्टार मानांकन देखील जाहीर करण्यात आले आहे.
देशपातळीवर नगरपालिकेचा लौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न आहेत नगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मेहनत आणि सातारकरांची साथ यामुळेच नगरपालिकेने ही कामगिरी केली असल्याचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सांगितले आहे.