महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं. त्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे संपन्न झालं आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून भाजपाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करण्यात आलं. तसेच भाजप नेत्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राज्यभरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधला आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अमित शाह?
ज्यांनी दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं ते शरद पवार आणि ज्यांनी अंतिम धोका दिला त्या उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने घरी बसवलं असल्याचं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. आम्ही कलम ३७० रद्द केलं. या देशातून दहशतवाद संपवला. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचं उच्चाटन करण्याचं लक्ष आम्ही ठेवलं आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न बघितलं आहे. मात्र, विकसित भारतासाठी महाराष्ट्र्र विकसित व्हायला हवा. कारण विकासाचं नेतृत्व मुंबई आणि महाराष्ट्र राहिला आहे. येत्या ८ फेब्रुवारीला दिल्लीमध्ये भाजपचं सरकार स्थापन करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
शरद पवारांनी १९७८ पासून दगाफटक्याचं राजकारण सुरू केलं होतं. तुम्ही त्याला २० फूट जमिनीत गाडण्याचं काम केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला, २०१९ साली पक्षाची विचारधारा सोडली. बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धांताला तिलांजली वाहून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले; त्यांना तुम्ही त्यांची जागा दाखवून दिली. घराणेशाहीच्या राजकारण करणाऱ्यांना जनतेनी चपराक लगावली असल्याचं त्यांनी वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्राच्या जनतेने मान्य केलं की एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच खरी शिवसेना आहे. आणि अजित पवार यांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-