ताज्या बातम्या

चीनसारखा उठाव मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झालं; 'सामनातून राज्य सरकारवर जोरदार निशाणा

दोन वर्ष कोरोनाने अगदी धुमाकूळ घातला होता. यातच आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दोन वर्ष कोरोनाने अगदी धुमाकूळ घातला होता. यातच आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. यामुळे चीनमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सामनातून म्हटले आहे की, “कोरोनाचे संकट चीनमध्ये असले तरी घोर जगाला लागला आहे. भारताने कोरोनाच्या दोन लाटांशी मुकाबला केला. त्या काळात करोना मृतांची हजारो प्रेते गंगेत सोडून देण्यात आल्याचे चित्र जगाने पाहिले. आता ती परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून भारत तयार आहे काय?” असा प्रश्न ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये विचारण्यात आला आहे.

“आज मोदी व संपूर्ण सरकार गुजरात विधानसभा निवडणुकीत रंगलंय आणि गुंतलंय! त्यांचे सर्व राजकीय हल्ले सुरू आहेत ते काँगेस आणि राहुल गांधींवर. आजही त्यांना राहुल गांधी हेच त्यांच्यासमोरील ‘संकट’ वाटत आहे. देशासमोरील इतर सर्व संकटे गौण ठरवून गुजरात निवडणूक जिंकणे हीच त्यांची ईर्षा दिसते, पण चीनच्या सीमेवर करोनाचे संकट पुन्हा उभे आहे व ते केव्हाही वावटळीसारखे आपल्याकडे घुसू शकते. ते संकट चीनबरोबरच्या चर्चेने सुटणार नसून त्या संकटाशी लढण्यासाठी पुन्हा एकदा आरोग्यविषयक ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ची उभारणी करावी लागेल,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

तसेच “कोरोना संकटकाळात राज्यात ‘ठाकरे सरकार’ सत्तेवर होते व सतत दोन वर्षे मुख्यमंत्री ठाकरे एक कुटुंबप्रमुख म्हणून जनतेची काळजी घेत होते, मार्गदर्शन करीत होते. आज ते चित्र नाही. कोरोनाप्रमाणे गोवरसाठीही विलगीकरणाची गरज असून हे निर्बंध कठोरपणे अंमलात आणायला हवेत. गोवर नियंत्रणासाठी विलगीकरण व्यवस्था करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन व महापालिकांना देण्यात आले हे ठीक; पण ही विलगीकरण पेंद्रे नक्की कोठे असणार, त्याची काय तयारी सुरू आहे त्याबाबतच्या सूचना कोण देणार? करोना काळात राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे लोकांशी संवाद साधून माहिती देत होते. इस्पितळात व कोविड पेंद्रांना भेटी देत होते, पण आज मुंबई-महाराष्ट्र गोवर साथीच्या विळख्यात सापडला असताना ‘आरोग्यमंत्री तानाजी सावंत दाखवा व एक लाख रुपये मिळवा’ असे जाहीर करावे लागणे हे राज्याच्या आरोग्य यंत्रणेचे अपयश आहे.

मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मिंधे गटाचे आमदार आजही खोक्यांची शय्या करून झोपले आहेत. कधी आसामचे पर्यटन तर कधी दुसरे काही, पण गोवरच्या त्रासाने लहान मुले, त्यांचे पालक हैराण आहेत. चीनमध्ये करोना लॉकडाऊनविरोधात जनतेने उठाव केला. तसे मुंबई-महाराष्ट्रात घडू नये म्हणजे झाले! अर्थात कामाख्या देवीच्याच मनात तसे काही असेल तर कोणी काय करावे?” असा चांगलाच टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ajit Pawar On Asia Cup 2025 IND vs PAK : "मॅच पाहणं शक्य होणार नाही, कारण..." भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर अजित पवारांच वक्तव्य

Asia Cup 2025 IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याच्या बहिष्कारामुळे खेळाडूंमध्ये चिंता! भारतीय खेळाडूंना गाैतम गंभीरने दिला धीर

Asia Cup 2025 IND vs PAK : "...त्यामुळे सामन्याला नकार देणं" भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर BCCI ने काय म्हटलं

Ankita Lokhande and Vicky Jain: अंकिता लोखंडेच्या पती विकी जैनला अपघात; हातात काचांचे तुकडे रुतले, तब्बल 45 टाके