आजवर सिद्धार्थ जाधवने असंख्य चित्रपट केलेत. काही सिनेमे पडद्यावर येतात आणि जातात, पण काही सिनेमे मनात राहतात. ‘आता थांबायचं नाय’ हे दुसऱ्या प्रकारातलं आहे. जेव्हा आपण कुठल्या गोष्टीचा एक भाग असतो, जी फक्त यशस्वीच नाही तर भावनिकपणे जोडून ठेवणारी असते तेव्हा त्या गोष्टीचं मोल वेगळंच असतं. सिद्धार्थ जाधवचा हा पहिला चित्रपट जो 50 दिवसांहून जास्त चित्रपटगृहात राहीला.
सिद्धार्थ जाधवसाठी हा सिनेमा फक्त एक प्रोजेक्ट नव्हता. “रोज कोणी ना कोणी नवीन माणूस फोन करून कौतुक करतंय. सुमित राघवन, दिलीप रावळकर, महेश मांजरेकर यांचे फोन आले. असं वाटलं जणू सगळं मराठी अभिनयसृष्टीचं कुटुंबच जवळ आलं. 25 दिवस, मग 50 दिवस आणि ते तुफान हाऊसफुल शोज, ती आठवण कायम लक्षात राहील.” मारुती कदम हे पात्र सिद्धार्थच्या नेहमीच्या शैलीपासून खूप वेगळं होतं. एक संयत बाप, न बोलणारा, पण गारुड करणारा, परिस्थितीनं थोडासा हरवलेला, पण आतून अजूनही मुलीसाठी लढणारा, ह्या पात्रामध्ये सिद्धार्थने केवळ अभिनय केला नाही त्यानं ते जगून दाखवलं.
पण हे यश फक्त त्याचं वैयक्तिक नाही. हा सिनेमा सिद्धार्थच्या मते, संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. सिद्धार्थसाठी हे सगळं अजून खास आहे , कारण अभिनय क्षेत्रातल्या त्याच्या वाटचालीतला हा एक नवीन वळण आहे . तो हसवणाऱ्या भूमिकांमधून चालत येऊन अशा एका संवेदनशील पात्रात उतरतो, आणि लोक म्हणतात, “हे सिद्धार्थचं सर्वोत्तम काम आहे.” ‘आता थांबायचं नाय’ हा सिनेमा थिएटरमधून घराघरात पोहोचतो आहे. सिद्धार्थ म्हणला की, “हा सिनेमा नाही, ही आठवण आहे, आणि ती कायम माझ्या हृदयात राहील.”