थोडक्यात
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली.
भूस्खलन, शेतीचे प्रचंड नुकसान, घरे उद्ध्वस्त होणे, संसार वाहून जाणे अशा घटनांनी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.
या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध मंदिर ट्रस्ट आणि गणेश मंडळे पुढे सरसावत आहेत.
Siddhivinayak Relief: Rs 10 crore aid Announced for Flood Victims : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. भूस्खलन, शेतीचे प्रचंड नुकसान, घरे उद्ध्वस्त होणे, संसार वाहून जाणे अशा घटनांनी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी विविध मंदिर ट्रस्ट आणि गणेश मंडळे पुढे सरसावत आहेत.
आतापर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ट्रस्ट, शिर्डीच्या साईबाबा संस्थान ट्रस्ट, शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्ट तसेच तुळजापूर मंदिर ट्रस्टने कोट्यवधींची मदत जाहीर केली आहे. यानंतर आता मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने पूरग्रस्तांसाठी तब्बल १० कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री मदत निधीसाठी जाहीर केली आहे.
सिद्धिविनायक ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांत गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ट्रस्टने मुख्यमंत्री मदत निधीला १० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.
मंदिराच्या विश्वस्तांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करूनही निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत आणि संपूर्ण राज्य पुराच्या संकटाशी झुंजत आहे. राज्य सरकार आपल्या परीने प्रयत्न करत आहे. भगवान श्री सिद्धिविनायकांच्या चरणी प्रार्थना आहे की महाराष्ट्र लवकर या संकटातून बाहेर पडो. या उद्देशानेच ट्रस्टने ही मदत जाहीर केली आहे. अशा प्रकारे राज्यातील प्रमुख देवस्थानांकडून पूरग्रस्तांसाठी उदार मदत जाहीर होत असून, संकटाच्या काळात मंदिरांचे हे योगदान मोठा दिलासा ठरत आहे.