सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक धागेदोरे समोर येत आहेत या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड यांना देखील केज पोलिस स्टेशनमध्ये अटक करण्यात आली आहे. यानंतर आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटीचे प्रमुख डॉ.बसवराज तेली यांच्या कसून चौकशीनंतर मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे हे घटनेनंतर गुजरातला गेले. तेथे 3 तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला. परंतु पैसे संपल्याने दोघेही पुण्यात आले. एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. 26 दिवस पोलिसांना गुंगारा कसा दिला याची पोलिस तपासात झाली आहे.
धारूर तालुक्यातील एका दाम्पत्याकडून आरोपींची माहिती
धारूर तालुक्यातील एका दाम्पत्याकडून आरोपींचा महत्वाचा क्ल्यू मिळाला असून सुदर्शन, सुधीर आणि नव्याने समावेश झालेल्या सिध्दार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना केज न्यायालयातून बाहेर काढताच नेकनूर पोलिस ठाण्यात आणले. येथे एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांनी या तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. यामध्ये नंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत प्रश्नांची भडिमार केली. त्याची उत्तरे देताना तिन्ही आरोपींना घाम फुटल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
तीन दिवसांपूर्वी त्रिकूट फुटले
सुदर्शन घुलेजवळ असलेले पैसे दोन ते तीन दिवसांपूर्वी संपले. त्यामुळे यातील कृष्णा आंधळे हा पैसे नेण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता. एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता; परंतु त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले, एका व्यक्तीला भेटणार होते; परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. कृष्णा फरार होणार यशस्वी झाला.
यू ट्यूबवर पाहिली बातमी
सुदर्शन घुलेसह तिघे जण एका रेल्वेस्थानकावर होते. एका व्यक्तीचा मोबाइल घेतला. त्यात देशमुख हत्या प्रकरणाची बातमी यू ट्यूबवर पाहिली होती. तेथूनच त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळे ते महाराष्ट्रात थांबले नाहीत.
मंदिरात जेवण अन् झोप
देशमुख यांची हत्या केल्यानंतर घुले, आंधळे आणि सांगळे हे तिघेही आरोपी सोबतच होते. रेल्वेने ते गुजरातमध्ये गेले. तेथील एका शिवमंदिरात थांबले. जवळपास १५ दिवस तेथेच राहिले. मंदिरातच जेवण आणि झोपणे अशी त्यांची दिनचर्या आतापर्यंत होती.