दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना शेवटच्या रांगेत बसवल्याचे फोटो समोर आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाने टोला लगावला आहे. ही बैठक 7 ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झाली होती. बैठकीत मतदार याद्या आणि निवडणूक आयोगासंदर्भात प्रेझेंटेशन झाले. यावेळीच्या छायाचित्रांमध्ये ठाकरे गटातील नेते शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसल्याने शिंदे गटाने काँग्रेसकडून ठाकरे गटाला अवमानजनक वागणूक मिळाल्याचा आरोप केला.
या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत शिंदे गटाचे आमदार आणि पदाधिकारी मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर गेले. त्यांनी बाळासाहेबांना वंदन करत उद्धव ठाकरे यांना “माफ करा, सडका मेंदू साफ करा” अशा शब्दांत टोमणे मारले. शिंदे गटाचा दावा आहे की, बाळासाहेबांनी आत्मसन्मान व अपमानाविरुद्ध लढण्याचा धडा दिला, पण उद्धव ठाकरे काँग्रेससोबत राहून स्वतःचा आणि महाराष्ट्राचा अपमान करून घेत आहेत. आमदार मनिषा कायंदे, प्रवक्ते शितल म्हात्रे आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते.
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनीही टीका करत, “एक खासदार असलेल्या पक्षातील नेत्यांनाही पुढच्या रांगेत बसवले, पण उद्धव ठाकरे मात्र मागे गेले. काँग्रेसने काय अवस्था केली आहे हे दिसते” असे वक्तव्य केले.
राहुल गांधी, सोनिया गांधी व प्रियांका गांधी यांनी ठाकरे कुटुंबाला आपले नवीन घर दाखवले होते. शरद पवार आणि कमल हासन यांच्यासह सर्वजण बैठकीत सहभागी होते, व त्यात कुठलाही अपमान नव्हता. या प्रकरणामुळे शिंदे-ठाकरे गटातील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे.