Maharashtra Politics : अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय हालचाली झपाट्याने सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. दुखवट्याचा काळ असताना सत्तेच्या हालचाली सुरू होणे योग्य नसल्याचे त्यांनी सूचित केले.
संजय राऊत म्हणाले की, अशा संवेदनशील क्षणी भाजप नेहमीच राजकीय फायदा पाहतो. 'भाजप हा पक्ष मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारा पक्ष आहे.' याआधीही बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर असाच प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला. “आमच्याकडे सांगण्यासारखं बरंच आहे, पण सध्या शांत राहणंच योग्य आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर बोलताना राऊत म्हणाले की, हा निर्णय पूर्णपणे त्यांच्या पक्षाचा आहे. उपमुख्यमंत्रीपद दुर्दैवी घटनेमुळे रिक्त झाले असून, त्यावर काय भूमिका घ्यायची हे संबंधित पक्षानेच ठरवावे, असे त्यांनी नमूद केले.